विश्वज्योत शाळेने फी नाही भरली म्हणून थेट २८ विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा अवैधरित्या दाखला पोस्टाने दिला घरी पाठवून; युवासेना छेडणार आंदोलन
पनवेल दि.28 (वार्ताहर): खारघर येथील विश्वज्योत शाळेचा मुजोरपणा वाढत चालला असून शाळेची फी नाही भरली म्हणून थेट २८ विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा अवैधरित्या दाखला पोस्टाने त्यांच्या घरी पाठविल्याबद्दल युवासेनेने संताप व्यक्त केला असून यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे या शाळेची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती युवासेनेचे सह सचिव रुपेश पाटील यांनी देऊन युवासेना पालकांच्या बरोबर असून यासाठी शाळे विरोधात आंदोलन छेडण्याच इशारा त्यांनी दिला आहे. पालकांना आपल्या हक्कांसाठी, विद्यार्थी हक्कांसाठी लढण्याचा हक्क घटनेने दिला आहे आणि खारघर मधील शेकडो पालकांनी ह्याच हक्काचा उपयोग करीत विश्वज्योत शाळेने अवैधरित्या वाढविलेल्या फी च्या विरोधात लढा सुरू केला. शेकडो पालक २०१८ पासून ह्या वाढीव फी बाबत भांडत आहेत, मिटिंग होत होत्या पण नियमानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका आणि अधिकृत अधिकाऱ्यांनी मिटिंग ला बसायला हवं पण पालकांसोबत मार्केटिंग वाले आणि ज्यांना फी बाबत कोणताही अधिकार नाही अशा लोकांना बसविले जाते त्यामुळे ह्या वाढीव फी बाबत कोणताही तोडगा निघाला नाहीय आणि पालक प्रतीक्षेत राहीले आहेत. त्यात गेल्या वर्षांपासून कोविड मुळे शासनाचाच निर्णय आला की ह्या काळात कोणतीही वाढीव फी भरू नये आणि शाळांनी इतर वाढीव शुल्क लावू नये तरीही ह्या शाळेने अतिरिक्त फी लावली आणि मागील फी व आत्ताची फी असे मिळून लाखोंची फी मेल द्वारे पाठवली. शाळा गेल्या वर्षांपासून बंद आहेत, बस, वीज वापर, बाकी सर्वच खर्च जो पूर्वी शाळांना यायचा तोही बंद झालेला असतांना सुद्धा शाळेने वाढीव फिज पाठविल्या आहेत, कहर म्हणजे मुलं शाळेत जात नाहीत तरी स्पोर्ट्स फी आकारली गेली आहे हे मोठं विलक्षण लूट आणि संतापजनक आहे. ह्याच कारणामुळे पालकांनी ही वाढीव आणि चुकीची फी भरण्यास शाळेला नकार दिला असता ह्या मुजोरी शाळेने २८ विद्यार्थ्यांना थेट शाळेतून काढून टाकले आहे आणि पोस्टाने त्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या घरी पाठविले आहे. ह्या घटनेने खारघर मधील समस्त पालकांमध्ये संताप निर्माण झाला असून आतातरी ह्या मुजोर शाळांवर सरकारने, शिक्षण अधिकाऱ्यांनी लगाम घालून त्यांना कडक शासन करण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांजकडे केली आहे. २० दिवस झाले शाळेने असं बेकायदेशीर रित्या मुलांना शाळेतून काढून त्यांना ऑनलाईन क्लास मधून काढून त्यांचा शिकण्याचा अधिकार काढून घेतला आहे आणि हे घटनेने दिलेल्या ‘शिक्षणाचा अधिकार” कायद्याचे उल्लंघन असल्याचे यावेळी बोलतांना युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शाळा जुमानत नसून कोणताही तोडगा काढण्यास, चर्चेला तयार नाहीत, रायगड शिक्षण अधिकारी, आयुक्त व शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी वारंवार भेटून ही काही कारवाई शाळेवर केली नाहीय त्याचमुळे पालक युवासेनेचे सह सचिव रुपेश पाटील यांच्याकडे आले. त्यांनी पालकांचे म्हणने ऐकून शाळेला फोन केला मात्र तातडीने मिटिंग देण्यास टाळाटाळ केली व मुद्दामहून पालकांना परत नोटिसा पाठीवल्या गेल्या, ह्या विश्वज्योत शाळेच्या मुजोरी विरोधात युवासेना पालकांच्या सोबत असून पालकांची समस्या तातडीने पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांजकडे मांडली असून तातडीने ह्यावर कारवाई करावी व शाळेला शासन करावे ही विनंती केली आहे. चुकीची फी वाढ केल्यामुळे ह्याआधीही शाळेवर कारवाई होऊन २००८ साली शाळेची परवानगी काढून घेण्यात आलेली होती. तरी सुद्धा परत अनधिकृत रित्या, शाळांनी फी साठी बळजबरी करू नये, मुलांना काढू नये असे शासनाचे आदेश असतांना सुद्धा महाराष्ट्रात शाळेची अतिशयोक्ती कारवाही म्हणून ह्या शाळेने मुलांना थेट शाळेतून काढून शाळा सोडल्याचा दाखला जबरस्तीने दिला आहे. युवासेना पालकांच्या सोबत असून लवकरच शाळेसमोर आंदोलन करण्याची तयारी करत आहे असे ह्यावेळी बोलताना रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले.