‘शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी’ ने जपली सामाजिक बांधिलकी….कोकण मधील पुरग्रस्तांना वाटप केले अत्यावश्यक साहित्य.
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )दिनांक २२ व २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या भयंकर अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली, रातोरात हजारो कुटुंबे अक्षरश: बेघर झाली. घरातील सर्व साहित्य, वस्तु पाण्यात भिजून मातीमोल झाली, पै पै करत जमवलेली संसार उपयोगी वस्तु आणि पशुधन अक्षरश: डोळ्यासमोर पुराच्या महाप्रचंड वेगात वाहून गेली. स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी जो तो प्रयत्न करू लागला, पाण्याचा प्रवाह आणि स्तर वाढत होता तसा लोकांना सुरक्षिततेसाठी उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागला. पुराच्या पाण्यात घरे अक्षरश: सपशेल बुडाली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पाहतो तर काय, प्रचंड चिखलाने भरलेली घरे, ओसरी, जनावरांचा गोठा, जिकडे तिकडे पुराच्या पाण्याबरोबर वाहत आलेला कचरा आणि घाणच घाण,घरातील अनेक वस्तु पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या.आहे त्या वस्तु वापरण्यायोग्य नव्हत्या जे कांही मागे राहिले होते ते केवळ अंगावरचे तेवढे कपडेच. या अतिवृष्टीमुळे सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान तर झालेच आहे त्याचबरोबर डोळ्यासमोर आपला संसार पाण्यात वाहून गेल्यामुळे अनेक लोक मानसिक दृष्ट्या खचले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आपला संसार आत्ता उभा कसा करायचा ? याच विवंचनेत पूरग्रस्त बांधव आहेत. अशा वेळी लिंगायत समाज संकट काळात नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धाऊन जातो.यावेळीही पूरग्रस्तांना मदत करून लिंगायत समाजाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
महात्मा बसवेश्वरांच्या मानवतावादी विचारधारेवर आधारित असलेल्या नवी मुंबईतील ‘शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी’ या लिंगायत समाजाच्या संस्थेने नेहमीप्रमाणे यावेळेलाही संकटकाळात अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निश्चय केला. संस्थेचे विश्वस्त, कार्यकारी मंडळ आणि नवी मुंबईतील लिंगायत समाज एकत्र येत बाधित कुटुंबीयांना अत्यावश्यक साहित्य आणि वस्तूंचे वाटप करून छोटीशी मदत करायचे ठरवले. त्यानुसार, अतिवृष्टीने बाधित झालेल्या तीनशे पन्नास कुटुंबीयांना सोलापुरी चादर, टॉवेल, चटई, लहान मुलांसाठी टी शर्ट आणि हाप पॅन्ट या अत्यावश्यक कपड्यांचे वाटप करण्यासाठी किट बनवले. महाड तालुक्यातील सवाद, कणगुले, बिरवाडी, कुंभारवाडा, वेताळवाडी, तांबाड भुवन, कुंभारआळी, विरेश्वरआळी या वाड्या वस्त्यांवर शरण संकुलच्या कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्षात जाऊन बाधित कुटुंबीयांना सदर अत्यावश्यक कपड्यांची किट देऊन त्यांची सेवा केली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्या महापुराचे भयंकर प्रसंग शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर कथन केले. तत्पूर्वी, सवाद गावांतील महिलांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष जी. बी. रामलिंगय्या यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणि अतिवृष्टीने विस्कळीत झालेला सर्वांचा संसार लवकरात लवकर उभा राहो अशी प्रार्थना करण्यात आली. सर्वांना महात्मा बसवेश्वरांचे पुस्तके भेट देण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी ‘शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी’ या संस्थेने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. सर्व ग्रामस्थांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सहकार्य करत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जी. बी. रामलिंगय्या, उपाध्यक्ष जगदीशप्पा एच. गौडर, सह खजिनदार सुनील पाटील, सह सचिव आनंद गवी, कमिटी सदस्य प्रकाश अवरनळ्ळी आणि वैजिनाथ आग्रे उपस्थित होते. यावेळी तेथील स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्ते अनंत महाडकर, सतीश ऐलणकर, अक्षय गुरबडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवी मुंबई व परिसरातील लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी ‘शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी’ ही संस्था सदैव कार्यरत असते असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.