तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराला ऊत
पनवेल/प्रतिनिधी:पनवेल तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागातील कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा मनमानी कारभार वाढला असल्याची तक्रार रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल तालुका शिवसेना संघटक भरत पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरुपात केली आहे.
बेकायदेशीर रेशनकार्ड देणे, रेशनकार्डातील उत्पन्न व कमी व बायोमॅट्रीक करुन, बारकोड नंबर देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. पनवेल तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेतील काही कर्मचारी सर्वसामान्य कार्डधारकांची अडवणूक करीत असून त्यांच्याकडे कामासाठी पैशाची मागणी करीत असतात. पुरवठा शाखेतील कर्मचार्यांनी आपली स्वतःची एक दलालांची साखळी विकसित केलेली असून त्यांच्या मर्जीतले खाजगी दलाल कोणतेही काम सकाळी 10.30 ते 5.30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळात त्याच दिवशी करुन देतात. मात्र दलाला व्यतिरिक्त कोणी काम घेवून आले तर त्यांना आठ आठ दिवस थांबावे लागते. या कर्मचार्यांच्या खाबू वृत्तीमुळे गरीब सर्वसामान्य नागरिक यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी वेळोवेळी नागरिकांकडून केल्या जात आहेत. यामुळे मार्च सन 2019 ते जुलै 2020 पर्यंतची संपूर्ण कागदपत्रे तपासून बेकायदेशीर रेशनकार्ड, रेशनकार्डातील कमी केलेले उत्पन्न तसेच बायोमॅट्रीक करुन बारकोड नंबर देणार्या कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. रेशनकार्डाची कामे कोणत्याही अमिषाला बळी न पडता सजातील तलाठी यांच्याकडे दिल्यास सर्वसामान्य नागरिक यांच्या रेशनकार्डाचे काम वेळेवर पूर्ण होईल त्याचप्रमाणे संघटनेने जनहितार्थ सुचविलेल्या मार्गानुसार कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक खाते रायगड अलिबाग, नवी मुंबई यांचेकडे तक्रारी करणे भाग पडेल असा इशारा भरत पाटील यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.